राज्यशासनाकडून सूचना न आल्याचे विद्यापीठाचे स्पष्टीकरण
मुंबई : प्रत्यक्ष शिक्षण सुरू होऊन दोन महिने उलटले तरी विद्यापीठाने वसतिगृहे सुरू केली नाहीत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह पीएचडी करणाऱ्या महिलांना याचा फटका बसत आहे. वारंवार मागणी करूनही वसतिगृहे सुरू न झाल्यास छात्रभारती विद्यार्थी संघटनेने बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईसह राज्य आणि देशभरातून मुंबई विद्यापीठात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी अद्यापही घरूनच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. काही विद्याशाखांचे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर अवलंबून आसल्याने त्यांची विशेष कोंडी झाली आहे. विद्यापीठाचे कर्मवीर भाऊराव पाटील (मुलांचे वसतिगृह) हे एकच वसतिगृह सुरू आहे. तेथे संशोधक विद्यार्थी आहेत. परंतु संशोधन करणाऱ्या महिलांचे वसतिगृह सुरू करण्यात आलेले नाही. महिला संशोधकांनी याबाबत तक्रार करूनही वसतिगृह सुरू झालेले नाही. याबाबत पत्रव्यवहार करूनही विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप छात्रभारतीकडून करण्यात आला आहे.
‘विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील सर्व विद्यापीठांना आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याची सूचना केली आहे. समाजकल्याणसह राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये वसतिगृहे सुरू झाली आहेत. मात्र मुंबई विद्यापीठाला याचा विसर पडला आहे. वसतिगृहांचे प्रमुखही विद्यार्थ्यांना सहकार्य करत नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने वसतिगृहांचा प्रश्न तातडीने सोडवावा,’ असे छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे श्रीधर पेडणेकर यांचे म्हणणे आहे. ‘राज्य शासनाकडून त्याबाबत कोणत्याही सूचना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अद्याप वसतिगृह सुरू करण्यात आलेले नाहीत,’ असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पदव्युत्तर विद्यार्थीही प्रतीक्षेत
लोककला, नाटक, संगीत यासह विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाची अधिक गरज आहे. मुंबईत येऊन राहण्याची विद्यार्थ्यांची तयारी असतानाही केवळ वसतिगृह बंद असल्याने ते येऊ शकत नाहीत. सध्या कला विभागांमध्येही लोककला, संगीत, नाटक असे विषय ऑनलाइन शिकावे लागत आहे. वसतिगृहांचे र्निजतुकीकरण, डागडुजी, स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा असल्याने ती पुन्हा सुरू करण्यास अडचणी येत असल्याची चर्चा विद्यापीठात सुरू आहे.
शासनाच्या सूचनेची प्रतीक्षा कशाला?
वसतिगृह सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनेची विद्यापीठांना आवश्यकता काय, असा सवाल अधिसभा सदस्य धनराज कोहचाडे यांनी केला आहे. प्रत्यक्ष शिक्षण सुरू झाले तेव्हाच वसतिगृहांची गरज निर्माण झाली. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळाले तर त्यांनाही प्रत्यक्ष शिक्षणाचा अनुभव घेता येईल. किंबहुना विद्यापीठानेच या संदर्भात पुढाकार घ्यायला हवा होता, असेही ते म्हणाले.
The post वसतिगृहे सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3FQSgt7
via
No comments:
Post a Comment