परीक्षार्थ्यांची मागणी
मुंबई : सर्व प्रकारच्या सरकार भरती परीक्षा एमपीएससीच्या (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) माध्यमातून घेण्यात याव्यात, अशी मागणी आता पुन्हा एकदा परीक्षार्थ्यांनी उचलून धरली आहे. म्हाडा आणि आरोग्य विभागाच्या परीक्षा भरती गैरप्रकारानंतर महाआयटीच्या मान्यताप्राप्त कंपन्यांकडून परीक्षा घेण्यास विरोध वाढला आहेच; पण त्याच वेळी आता म्हाडाची भरती परीक्षा आयबीपीएससारख्या संस्थांच्या मदतीने घेण्यासही परीक्षार्थ्यांकडून विरोध होऊ लागला आहे. भरती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हाच महत्त्वाचा उपाय असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
विविध सरकारी विभागांतील भरती परीक्षा महाआयटीने निवडलेल्या कंपन्यांकडून घेतल्या जात आहेत. मात्र मागील काही वर्षांत या कंपन्या दलालांना, अधिकाऱ्यांना हाताशी धरून परीक्षेत गैरप्रकार करत असून लाखो परीक्षार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. आधी आरोग्य विभागाच्या आणि आता म्हाडा भरती परीक्षेच्या गैरप्रकारातून ही बाब अधोरेखित झाली आहे. आता हे गैरप्रकार रोखण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया एमपीएससी समन्वय समिती, महाराष्ट्र ही विद्यार्थ्यांच्या, परीक्षार्थ्यांच्या संघटनेने दिली. मुळात भरती परीक्षेचे कंत्राट मिळालेल्या कंपन्याच पेपर फोडत असून गैरप्रकार करत असल्याचे समोर आले आहे, तर महत्त्वाचे म्हणजे गैरप्रकार करणाऱ्या कंपन्यांविरोधात कोणतीही कडक कायदेशीर कारवाई अथवा शिक्षा होताना दिसत नाहीच; पण उलट त्यांना काळ्या यादीतून वगळून अभय देण्याचाच प्रयत्न होत असल्याचा आरोप समितीने केला आहे.
कंत्राटदार कंपन्यांना आता हद्दपार करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे सर्व परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातूनच व्हायला हव्यात, अशी आमची मागणी आहे. आता म्हाडाच्या भरती परीक्षा टीसीएस वा आयबीपीएसच्या माध्यमातून घेण्यास आमचा विरोध आहे. या परीक्षेसाठी संस्थांबरोबर करार केला जाईल. करार संपला आणि नव्याने भरती प्रक्रिया सुरू झाली की पुन्हा महाआयटीच्या कंपन्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे म्हाडासह सर्व भरती परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातून घ्याव्यात. – राहुल कवठेकर, अध्यक्ष, एमपीएससी समन्वय समिती, महाराष्ट्र
The post सर्व परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातून घ्याव्यात; परीक्षार्थ्यांची मागणी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/33iJrtp
via
No comments:
Post a Comment