मुंबई : बेस्टचा २०२२-२३ या आर्थिक वर्षांचा २,२३६ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठवला असून शुकवारच्या बैठकीत त्यावर चर्चेला सुरुवात झाली. अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या भाषणाने या चर्चेला सुरुवात झाली असून उर्वरित चर्चा सोमवारच्या बैठकीत होणार आहे. पालिकेने बेस्टला १,६४१ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची मागणी बेस्ट समितीने केली असल्याने स्थायी समिती नक्की काय निर्णय घेणार याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे. बेस्टची आर्थिक तूट दिवसेंदिवस वाढत आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षांत बेस्टचा तोटा १,६४१ कोटी रुपये होता. एका वर्षांत त्यात ५९५ कोटी रुपयांची वाढ झाली असून २०२०-२३ या आर्थिक वर्षांत तूट २,२३६ कोटी रुपयांवर गेली आहे. एवढय़ा तूटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीने नुकताच मंजूर केला असून तो आता स्थायी समितीकडे सादर करण्यात आला आहे.
बेस्ट उपक्रमाच्या सर्वागिण विकासासाठी परिवहन क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, प्रतिवर्षी वाढणाऱ्या तोटय़ावर नियंत्रण आणण्यासाठी प्राथमिक स्तरापासून कार्यरत असणारी समिती स्थापन करावी. मुंबईतील बहुतांश बस टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ आहेत, त्याठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत खासगी गाडय़ा उभ्या करण्यासाठी वाहनतळ उपलब्ध करून द्यावे. विनातिकीट प्रवासी संख्येला आळा घालण्यासाठी तिकीट तपासनीसांची संख्या वाढवावी आदी सूचना अध्यक्ष जाधव यांनी केल्या.
तिकीट देण्यासाठी बस वाहकांना देण्यात आलेल्या यंत्रापैकी ५० टक्के यंत्रे नादुरुस्त असून त्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे, वाहतूक विभागाचा महसूल वाढण्याच्या उद्देशाने या विभागातील बसचालक, वाहक व अन्य वाहतूक बाह्य कर्मचारी मनुष्यबळाचे योग्य नियोजन करावे. प्रत्येक आगारामध्ये तळघरात पार्किंगच्या माध्यमातून महसूल प्राप्त करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. बेस्ट उपक्रमाच्या कार्यशाळांमध्ये खासगी वाहनांच्या दुरुस्तीच्या माध्यमातून महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, रेल्वे, मेट्रो स्थानकापासून जास्तीत जास्त बस सेवा सुरू करावी, असेही जाधव यांनी सूचित केले.
The post बेस्टच्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीत चर्चा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/32tUuQa
via
No comments:
Post a Comment