२०० हून अधिक नागरिकांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांना पालिकेची परवानगी बंधनकारक
मुंबई : ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंधांच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. सभागृह, खुल्या किंवा मोकळय़ा जागेतील आयोजित कार्यक्रमास २०० हून अधिक व्यक्ती एकत्र येणार असतील तर अशा कार्यक्रमांना पालिका विभाग कार्यालयाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तसे आदेश दिले असून २० डिसेंबरपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे नाताळ व नववर्ष स्वागताच्या मेजवान्या, लग्न सोहळे व राजकीय सभा यावर निर्बंध येणार आहे.
ओमायक्रॉनमुळे करोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून राज्य सरकार, पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. गेल्या आठवडय़ात जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार कोणत्याही समारंभाला एक हजारापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार असतील तर स्थानिक प्राधिकरणाची परवानगी आवश्यक करण्यात आली होती. मात्र दोनच दिवसात पालिका आयुक्तांनी हा नियम अधिक कडक करीत २०० पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी होणाऱ्या कार्यक्रमाला पालिकेची परवानगी बंधनकारक केली आहे. त्यामुळे आता सभागृह किंवा खुल्या जागेत २०० पेक्षा जास्त व्यक्ती जमणार असतील तर त्याकरिता पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर महापालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांकडून, तसेच पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरण मोहिमेला दिलेला वेग यामुळे मुंबईतील करोना संसर्ग परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. ओमायक्रॉनचा मुंबईत हा संसर्ग वाढू नये म्हणून पालिका प्रशासनाने मुंबईकरांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये नाताळ तसेच नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर समारंभ आणि सोहळय़ांचे आयोजन झाल्यास गर्दी होण्याचा धोका आहे. तसेच लग्न व इतर समारंभांच्या आयोजनातून वाढत असलेली गर्दी रोखणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर हॉटेल्स, उपहारगृह आणि इतर सार्वजनिक आस्थापनांमध्ये गांभीर्याने नियम पाळले जात नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी सोमवारी पुन्हा एकदा नवीन नियमावली जाहीर केली आहे.
नव्या नियमावलीत पूर्वीचे काही नियम तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार बंदिस्त सभागृहांमध्ये आयोजित होणारे कोणतेही कार्यक्रम, समारंभ, उपक्रमांमध्ये सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींनाच उपस्थितीची परवानगी आहे. मोकळय़ा-खुल्या जागेत होणाऱ्या कार्यक्रम, समारंभ, उपक्रमांसाठी सदर जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के एवढय़ाच संख्येने उपस्थितीला परवानगी असेल. मात्र एखाद्या सभागृहाची किंवा मोकळय़ा जागेची क्षमता जास्त असेल अशा ठिकाणी २०० पेक्षा अधिक व्यक्ती जमणार असतील तर त्यासाठी पालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच या ठिकाणी करोना प्रतिबंधक सर्व नियमांचे प्रत्येक नागरिकाला काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित कार्यक्रमाला परवानगी दिल्यानंतर पालिकेच्या पथकाने तेथे जाऊन तपासणी करावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.
The post मुंबईत पुन्हा कडक निर्बंध appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3EgbUwP
via
No comments:
Post a Comment