जागा नसल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणच सुरू
मुंबई : राज्य सरकारने करोनाबाधित कैद्यांना विलगीकरणात ठेवता यावे यासाठी मुंबई महापालिकेच्या शाळा ताब्यात घेतल्या असून या शाळा ताब्यात मिळाव्या यासाठी पालिकेने पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कैद्यांच्या विलगीकरणासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती पालिकेला केली आहे. यापैकी एक शाळा सध्या दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्यात आली असून तेथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर विलगीकरणासाठी पालिकेच्या शाळांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच आर्थर रोड कारागृहातील कैद्यांना करोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी पालिकेने दोन शाळा उपलब्ध केल्या होत्या. आजही पालिकेच्या या शाळा सरकारच्याच ताब्यात आहेत. या दोन्ही शाळांमध्ये सध्या सुमारे १०० कैदी आहेत. कैद्यांना दक्षिण मुंबईत सुरक्षित जागा मिळणे अवघड आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यामुळे पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते दहावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र कैद्यांच्या विलगीकरणासाठी दिलेल्या शाळा अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. कैद्यांच्या विलगीकरणासाठी दिलेली भायखळा एस ब्रिज येथील शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना भायखळा पूर्व येथील पालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्याची वेळ पालिकेवर आली. तसेच पठाणवाडी रोड येथील शाळेत २,५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही शाळाही सरकारच्याच ताब्यात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत न जाता ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे.
या शाळा पालिकेच्या ताब्यात द्याव्या अशी विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाला करण्यात आली आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालिकेच्या ई विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मनीष वाळुंज यांनी दिली.
The post विलगीकरणासाठी दिलेल्या पालिका शाळा सरकारच्याच ताब्यात appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3sx2E5d
via
No comments:
Post a Comment