डॉ. उल्हास कोल्हटकर ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ आणि समुपदेशक
शासन आदेशावरून गेल्या आठवड्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दीड वर्षापासून शाळेत न गेल्याने विद्याथ्र्यांची बदलेली मानसिकता, घरात कोंडून राहिल्यामुळे झालेले परिणाम आणि याचा विचार करून पालक, शिक्षक, समुपदेशक तसेच समाजाने घ्यावयाची भूमिका याविषयावर ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्याशी केलेली ही बातचित…
’ करोना महासाथीमुळे विद्याथ्र्यांवर काही दुष्परिणाम झाले आहेत का?
करोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. शिक्षक, मित्रांशी थेट संवाद नाही. मोबाइल आणि दूरचित्रवाणी संचातील खेळ, मनोरंजनात अडकून राहणे याव्यतिरिक्त मुलांना संवादाचे कोणतेही साधन उपलब्ध झाले नाही. दीड वर्षात मुलांमधील संवाद संपल्याने अनेक मुलांच्या संभाषण क्षमतेची पातळी घसरली आहे. बोलताना त्यांच्यात अडथळे, एकलकोंडेपणा, वजने वाढली आहेत. मंदत्व आले आहे.
’ वैद्यकीय तपासणीत मुलांमध्ये कोणते दुष्परिणाम दिसून आले आहेत?
शाळा सुरू असल्या की शाळा, शिक्षक, मित्र, अभ्यास असा संवाद विद्याथ्र्यांचा होत असतो. बाहेरील हलक्याफुलक्या वातावरणात मुले रमतात. दीड वर्षात करोनामुळे शाळा बंद राहिल्या. कठोर निर्बंधांमुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले. मित्र, नातेवाईक, आवडीच्या ठिकाणी जाणे बंद झाले. या काळात फक्त घर, मोबाइल, खाणे आणि झोपणे एवढ्याच चक्रात मुले अडकली. या प्रकारामुळे मुलांमधील एकलकोंडेपणात वाढ झाली. दूरचित्रवाणीवरील विनोदी चित्रमालिका, इतर मनोरंजन, आवडीचे विषय त्यांनी वर्षभर पाहिले. सतत तेच कार्यक्रम पाहून मुले आता कंटाळली आहेत. मोबाइलवर तेच खेळ, गमती जमतींना ती कंटाळली आहेत. मनोरंजनाचे दुसरे साधन नसल्याने नाईलाजाने ती मोबाइलला चिकटून बसत आहेत.
’ शारीरिक, मानसिक स्वरूपात काही बदल आढळून आले आहेत का?
सतत घरात बसून मुलांमध्ये जडत्व, लठ्ठपणा आला आहे. त्यांना आता अभ्यास, वाचन, पाठांतर, शाळेचा कंटाळा आला आहे. आई-बाबा नोकरीसाठी बाहेर, घरात आजी-आजोबा. सकाळी आईने घरात करून ठेवलेले खायाचे. मोबाइलवर खेळायचे. मुले, पालक, आजोबा-आजी हा संवाद पू्र्णपणे तुटल्याने मुलांना बोलताना अडथळे येत आहेत. संवाद हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आता डोंबिवलीसारखी शहरे डॉरमिटरी (दिवसभर बाहेर फक्त निवाऱ्यासाठी घरी) झाली आहेत. पालक दिवसभर नोकरीसाठी बाहेर, मुले दिवसभर शाळेत, त्यानंतर खासगी शिकवण्या, आजी-आजोबा घरात ते त्यांच्या कामात व्यस्त. पालक घरी आले की मुलांशी बोलणे नाही. मुलांचे दिवसेंदिवस बोलणेच न झाल्याने त्यांच्यात तोतरेपणा आला आहे. मंदत्व येऊन उशिरा बोलणे, समोरून बोलतोय ते उशिरा समजणे, आदी परिणाम दिसत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे मुलांमधील संभाषणाची पातळी घसरली आहे.
’ या समस्येवर मात करण्यासाठी प्रभावी उपाय कोणता आहे?
शाळा बंद असल्याने घरात राहून मुलांमध्ये वैगुण्य निर्माण झाली आहेत. ही मुले विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक, तंत्रस्नेही साधनांना खिळून व्यसनी झाली तर त्यांना त्यामधून बाहेर काढणे खूप मुश्कील होईल. म्हणून जगभरातील शिक्षणतज्ज्ञ, समुपदेशक देश, विदेशातील शासनकर्त्यांना शाळा सुरू करा म्हणून मागणी करीत होते. मुले एकदा शाळेत आली की मित्र, शिक्षक, अभ्यास असे संवादाचे वातावरण तयार होते. निर्माण
होणाऱ्या वैगुण्यातून ती आपसूक बाहेर येऊ शकतात. या पाश्र्वभूमीवर करोनाची आव्हानात्मक परिस्थिती असली तरी महाराष्ट्र शासनाने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. शाळांमधील मोकळ्या वातावरणातून ही मुले त्यांच्या वैगुण्यातून बाहेर येतील.
’ येत्या काळात या मुलांना समुपदेशाची गरज आहे का?
दीड वर्षानंतर मुले शाळेत येत असल्याने मुलांचे शिक्षक, पालक यांनी बारकाईने निरीक्षण करून त्याप्रमाणे त्याला समुपदेशन करणे आवश्यक आहे. केंद्रीय शाळांमध्ये तज्ज्ञ समुपदेशक असतात. सामान्य स्तरावरील मराठी, हिंदी शाळा, जिल्हा परिषद शाळांमध्ये अशी सोय नसते. त्यामुळे गरजेप्रमाणे प्रत्येक शाळेने समुदेशकांचा आता प्राधान्याने विचार करावा. शिक्षकांनी काही दिवस अभ्यासाबरोबर विद्याथ्र्यांची मानसिकता ओळखून त्यांच्या कलेने त्याचा अभ्यास घ्यावा. त्याच्याशी संवाद साधून त्याला बोलते करावे. त्याची समस्या ओळखून समपुदेशन करावे. सामाजिक संस्थांच्या समुपदेशकांनी शाळांमध्ये येऊन अशा कामासाठी शाळांना सहकार्य करावे.
’ मोबाइल व्यसनाचा मुलांवर कितपत परिणाम झाला आहे?
घरात मनोरंजनाचे दुसरे साधन नसल्याने आणि ऑनलाइन शिक्षणामुळे प्रत्येक मुलाच्या हातात मोबाइल आल्याने बहुतांशी मुले मोबाइलची व्यसनी झाली आहेत. अभ्यास एक भाग झाला तरी, त्यानंतर ही मुले आंतरमहाजालातील विविध साधनांशी जोडली जातात. तेथे जे पाहण्यात येतं, त्याच ती अनुकरण करतात. तेथे ती स्वत:ला व्यक्त करतात. ‘डार्कनेट’ नावाच्या प्रकाराने तर आताच्या तरुणाईला विळखा घातला आहे. तंत्रज्ञानातील गुन्हेगारीचा हा प्रकार मुलांना आकृष्ट करून घेतो. त्यात मुले सहज अडकली जातात. ही मुले रात्रीच्या वेळेत कुटुंबीय झोपले की रात्रभर या तंत्रस्नेही साधनांमध्ये अडकतात. त्यामधून जागरण आणि आजार उद्भवतात.
’ मुलांच्या समुपदेशनासाठी काही सामाजिक संस्था पुढे येत आहेत का?
मुलांमधील दीड वर्षातील गंभीर बदलाचा विचार करून मुलांना तंत्रस्नेही व्यसनातून बाहेर काढण्यासाठी काही प्रभावी उपाय केले पाहिजेत या विचारातून रोटरी अॅक्शन ग्रुप ऑफ अॅडिक्शन प्रीव्हेंशन गटाची स्थापना करण्यात आली आहे. तंबाखू, अल्कोहोल, अमली पदार्थ आणि महाजालातील व्यसने या विषयावर ही संस्था काम करणार आहे. अधिकधिक व्यसनी मुलांना बाहेर काढण्याचे काम ही संस्था करेल.
’ लहान मुलांना करोनाचा किती धोका आहे?
प्रौढांपेक्षा मुलांची प्रकृती सृदृढ असल्याने ती करोनावर आक्रमकपणे मात करू शकतात हे जगभरातील निरीक्षणातून पुढे आले आहे. ताप, सर्दी, खोकला अशा सहा दिवसांत मुलांचा करोना आजार निघून जातो. प्रौढांसारखे गंभीर रूप लहान मुलांमध्ये दिसून येत नाहीत.
– भगवान मंडलिक
The post आठवड्याची मुलाखत : मुलांच्या संभाषण क्षमतेत घट appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3aqQtgb
via
No comments:
Post a Comment