उद्योगमंत्र्यांचे अमित शहा यांना प्रत्युत्तर
मुंबई : विविध वित्तीय संस्थां, उद्योगांच्या माध्यमातून राज्याचे वैभव गुजरातला पळविण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. एवढेच नव्हे तर राज्याची सतत वित्तीय कोंडी करीत मोदी सरकार येथील जनतेवर सूड उगवित असल्याचा आरोप करीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्युत्तर दिले.
गतवैभव मिळवून देण्यात राज्य सरकार हतबल ठरतेय असे राजकीय भाष्य अमित शहा यांनी केले आहे. मात्र प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून महाराष्ट्र आणि मुंबईतील उद्योग पळवले जात आहेत. तेव्हा आधी महाराष्ट्राचे असलेले वैभव पळवून नेण्याचे काम केंद्र सरकार आणि गुजरातने थांबवावे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून ही राज्याच्या वैभवाची पळवापळवी सुरू आहे, अशा शब्दांत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पलटवार केला आहे.
शहा यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतांना शहा आणि त्यांचे गुजरातच केंद्राच्या मदतीने राज्याचे वैभव पळवत असल्याचा आरोप देसाई यांनी केला. करोना काळात गेल्या दोन वर्षात राज्यात २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून उद्योगही सुरू होत आहेत. पण केंद्राकडून नेहमी राज्यावर अन्याय केला जात आहे, राज्याला पुरेसा निधी दिला जात नाही. एवढेच नव्हे तर आंतराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र(आयएफएससी) बाबतचा अधिकार फक्त मुंबईचाच आहे. सर्वात मोठी शेअर बाजार आर्थिक केंद्राची दावेदार मुंबईच आहे. जगातील सर्व देशांना त्यांच्या बँका किंवा त्यांचे मुख्यालय मुंबईतच उघडायचे असते. उलट गुजराध्ये सुरू करण्यात आलेले गुजरात आंतराष्ट्रीय वित्तीय केंद्र( गिफ्ट) चालत नाही. त्यामुळे मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र होण्याचा मार्ग अडवू नका. राज्यात आपल्या विरोधकांचे सरकार आहे म्हणून अमित शाह यांनी जनतेसोबत दूजाभाव करु नये अशी मागणीही देसाई यांनी केली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सरकारने केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या सर्व अटी पूर्ण करण्यात आल्या असून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफासर करण्याची ग्वाही केंद्र सरकारच्या समितीने दिली. मात्र आमच्यानंतर अन्य राज्यांच्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्या केंद्र सरकारने मराठीची मात्र कोंडी केली आहे. नागपूरातील दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण संस्था दिल्लीला पळविली. सन २०१४ ते २०२१ पर्यंत केवळ राज्यात केवळ दोन वैद्यकीय महाविद्यालये मंजूर करून त्यांना २५३ कोटी देणाऱ्या केंद्र सरकारने याच काळात उत्तर प्रदेशात २७ वैद्यकीय महाविद्यालये मंजूर करीत २७०० कोटींचा निधी दिला. देशात सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात असतानाही सर्वात कमी रेमडेसिवीर दिले गेले. एक ना दोन सर्वच बाबींमध्ये केंद्राकडून राज्यावर अन्याय केला जात आहे. इथे तुमच्या आवडीचे सरकार नसले तरी तुमच्या निर्णयांचा फटका जनतेला बसतोय, अशा शब्दांत देसाई यांनी केंद्र सरकारला सुनावले.
‘केंद्रातील सरकारही बरखास्त करुन निवडणुका घ्या ’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन महाविकास आघाडीने भाजपबरोबर दोन हात करण्यासाठी समोर यावे, असे आव्हान देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना, महाराष्ट्राबरोबर केंद्रातील भाजपचे सरकार बरखास्त करुन निवडणुका घ्या, मग जनतेतील असंतोष कळेल, असे प्रतिआव्हान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
The post महाराष्ट्राचे वैभव गुजरातला पळविले; उद्योगमंत्र्यांचे अमित शहा यांना प्रत्युत्तर appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3Fjgb46
via
No comments:
Post a Comment